आज भारत बंद! २५ कोटी कामगार संपावर, वाचा नेमकं काय बंद राहणार आणि काय सुरु राहणार?
Bharat Bandh 9 July 2025
Bharat Bandh 9 July 2025 : देशभरात आज (बुधवार) ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली असून केंद्र सरकारच्या उद्योगपती धार्जिण्या आणि कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी हा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये ग्रामीण कामगार, शेतकरी संघटना तसेच काही सरकारी कर्मचारी संघटनांचाही सक्रीय सहभाग असून, जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक कामगार या संपात उतरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा : गड, धबधबे, धरणे! पर्यटकांना ठराविकच संख्येने प्रवेश, नवा नियम लागू होणार
नेमकं काय चालू आणि काय बंद?
आजच्या भारत बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सार्वजनिक वाहतूक, बँकिंग सेवा, शाळा-महाविद्यालये यावर याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी निदर्शक रस्त्यावर उतरले असून रस्ते अडवले जात असल्याचे वृत्त आहे.
बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता
सरकारी बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी होत असल्याने अनेक बँका आज बंद राहण्याची शक्यता आहे. चेक क्लिअरिंग, व्यवहार, ग्राहक सेवा यावर परिणाम होणार असून, काही ठिकाणी बँक शाखा उघडल्या तरीही कामकाज मर्यादित स्वरूपात होईल. तरी बँक युनियन्सकडून अधिकृत बंदची घोषणा करण्यात आलेली नसल्यामुळे काही सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे.
शाळा-महाविद्यालये सुरू, पण…
शालेय शिक्षण विभागाने कोणतीही बंद संदर्भातील अधिसूचना जारी केलेली नाही. मात्र काही शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. अनेक शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांची हजेरी कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही खासगी कंपन्यांनी कर्मचारी वर्गासाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिल्यामुळे राज्य परिवहन सेवा मर्यादित स्वरूपातच सुरू राहण्याची शक्यता आहे. शहरांमध्ये खासगी वाहने, रिक्षा, कॅब सेवा यावरही परिणाम होऊ शकतो. रेल्वे कर्मचारी बंदमध्ये सहभागी नसले तरी काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून स्थानकांवर निदर्शने होण्याची शक्यता आहे. परिणामी लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावू शकतात.
हे पण वाचा : पुण्यात ढोलताशा वाद्यांची सुरक्षा धोक्यात! काँग्रेसने PMCकडे मांडली ‘ही’ खास मागणी
बंदचा परिणाम संपूर्ण देशभर सारखा जाणवणार नसला तरी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये बँकिंग व वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मात्र बंद फारसा प्रभावी ठरण्याची शक्यता कमी आहे, असे निरीक्षण आहे.
